संतांच्या सांगण्याचा आपण विचारच केला नाही, त्याचे मननच जर केले नाही, तर पुष्कळ सांगितले तरी त्याचा काय उपयोग. देह हा अनित्य आहे, असे सर्व संतांनी एकमुखाने सांगितले आहे. तरीसुद्धा आम्हांला देहाचे प्रेम सुटत नाही, याला काय करावे?संतांवर विश्वास नसेल तर स्वतःचा अनुभव पाहावा. देहापासून सर्व सुख आहे असे आपण विचाराने ठरविले, पण खरोखर अनुभव काय येतो हे पाहावे.
आपण पाहतो ना, की लहानापासून मोठ्यांपर्यंत आणि रावापासून रंकापर्यंत, मनुष्याची सारखी धडपड चालू असते, आणि ती म्हणजे समाधानासाठी.
लहानाचे मोठे झालो, विद्या मिळवली, नोकरी मिळाली, पैसा- अडका मिळतो आहे, बायको केली, मुलेबाळे झाली; ज्या ज्या गोष्टीत समाधान मिळेल असे वाटले, त्या त्या करिता प्रयत्न केला. परंतु मग तरी समाधानाचा लाभ झाला का?