“पॅरालिसिस सारख्या आजारातुनही बरी झालेली ही आभाळमायातील अभिनेत्री पुन्हा झालीय कार्यरत!”

“‘दुर्गा झाली गौरी’ हया आविष्कार निर्मित नाटकातून तीची सुरुवात झाली. सुचेता भिडे-चापेकर यांच्याकडे ती भरतनाटयम् शिकत होती. त्यावेळी ३०० मुलींमधून या नाटकाकरिता निवड झाली. इयत्ता ७ वी ते १२ वी पर्यंत हे नाटक तीने केलं. बालमोहन शाळेच्या नाटकांमधूनही ती कामं करायची… पण एका अटीवर… त्यात नृत्य करायला वाव असेल तरच! रूपारेल कॉलेजच्या कला शाखेमधून तीने अर्थशास्त्राची पदवी घेतली.

एकंदर स्टेजवर वावरण्यात तीला एक गंमत वाटत होती, पण त्यात कुठेही कारकिर्द करण्याचा दृष्टिकोन नव्हता. ‘ईश्वर’ हा तीचा पहिला हिंदी चित्रपट. त्याच दरम्यान ‘झुलवा’ नाटक केंलं. प्रेम भावना, प्रेमभंग, बलात्कार… हे भावनिक पदर साकारायचे म्हणजे आव्हान होतं. सहकलाकार व दिग्दर्शकांचं साहाय्य लाभलं. ‘झुलवा’तील अभिनयाला महाराष्ट्र राज्याचे पारितोषिक, तसेच अखिल भारतीय नाटय परिषदेची दोन पारितोषिकं, व ‘नाटयदर्पण’चे पारितोषिक मिळाले. ‘झुलवा’ हा टर्निंग पॉईंट ठरला.

त्यानंतर २ जून १९९० रोजी ‘जन्मगाठ’ नाटक चालू असताना तिचा अपघात झाला व समाघात (ब्रेनचा आजार) झाला. त्यामुळे नृत्य बंद झालं. संकटांची जणू एक मालिकाच सुरू झाली. बरी झाल्यावर नृत्य सुरू केलं, परंतु, पुन्हा एक अपघात झाला. १० जून ९३ रोजी एका शूटिंग दरम्यान ‘मृत्युंजय’ सिरियलचा पूर्ण सेट अंगावर पडला. पॅरालिसिस झाला व वाचा गेली.

सहा महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर कुठे नीट बोलता येऊ लागले. या दुखण्यातून बरी होण्यासाठी जे उपचार केले, त्यात जास्त स्टिरॉईडस्च्या गोळया होत्या, ‘शॉक्स्’ ची ट्रीटमेंट होती. सांधे खिळणे (जाॅईंटस लाॅक) नर्व्हस ब्रेक डाऊन असं सारं चक्र फिरू लागलं. एक नकारात्मक दृष्टिकोन घेरू लागला. गुरू व आई यांनी या सगळयातून तीला धीराने बाहेर काढलं. ‘तू नोकरी कर, सिरियल कर, काहीही कर, पण खचून जायचं नाही’ अशी प्रसंगी सक्त ताकीद तर कधी प्रेमळ समजावणी त्या दरम्यान तिची आई करीत होती.

जवळपास जून ९३ ते फेब्रुवारी ९४ पर्यंतच्या ‘गॅप’नंतर महेश भट यांची ‘जमीन आसमान’, ‘शांती’ अशा मालिकांमधून पुन्हा कॅमेरासमोर ती उभी राहिली. बक्षिसं, पैसे, नाव सगळंच मिळत गेल्यावर अभिनय हे क्षेत्र आवडायला लागलं. यात करियर करायला काही हरकत नाही, असं वाटू लागलं. ‘ताईच्या बांगडया’ ह्या चित्रपटात देखील काम केलं. त्यानंतरचा लोकांनी उचलून धरलेला चित्रपट म्हणजे, ‘सरकारनामा’. ‘सरकारनामा’ मधील भूमिकेसाठी, पुन्हा एकवार फिल्म फेअर ऍवॉर्ड मिळाला. नाटय क्षेत्रातून एक चांगली भूमिका सामोरी आली. तीने स्वीकारली.

‘कुसूम मनोहर लेले’ हे ते नाटक… या नाटकासाठी अखिल भारतीय नाटय परिषद, नाटय निर्माता संघ, नाटयगौरव, नाटयदर्पण, कालनिर्णय ही निरनिराळी पारितोषिकं मिळाली. पण, प्रेक्षकांनी मनापासून ज्यावर प्रेम केलं अशी भूमिका म्हणजे, ‘आभाळमाया’ मधील प्रा. सुधा जोशीची भूमिका. ही भूमिका मनापासून आवडली. मूळात ही सुधा जोशीच्या मुलींची कहाणी होती. ती आकांक्षा व अनुष्काची गोष्ट होती. पण ती पण करता करता सुधा जोशीची कैफियत झाली. तिचीही कहाणी वाटू लागली.

‘आभाळमाया’च्या वेळी एक मजेशीर किस्सा झाला. सुधा जोशीचं जास्त काम हे तिच्या मित्राबरोबर आहे, हे तिला समजलं. नवरा संजय ती भूमिका करणार होता. एकत्र काम करायला मिळेल म्हणून तीनेही ‘हो’ म्हटलं. आभाळमाया टीम म्हणजे, आता जणू एक कुटुंबिय झाले. लेखकांशी चर्चा करायला मिळते. ब-याचवेळा,भूमिकेचा जो अभ्यास झालाय, तो लेखक-दिग्दर्शकासमोर ठेवला.बाजू मांडली. अशा वेळी दिग्दर्शक-लेखक यांच्याशी क्वचित प्रसंगी वाद होतो. काही बाबतीत दिग्दर्शक व लेखक स्वीकारशील असतात.

दिग्दर्शकाला अनेक बाजूंचा व सर्वच पात्रांचा विचार करायचा असतो. कधी कधी म्हणणं लेखक व दिग्दर्शक स्वीकारतात, पण जे वाटलं, जे दिग्दर्शकाला सांगण्याइतपत महत्त्वाचं आहे, ते सांगताना भिडस्तपणा ठेवत नाही. चर्चा केल्यानं भूमिका जास्त चांगली साकारता येते, असा माझा अनुभव आहे. ब-याच वेळा, चर्चेतून त्या व्यक्तिरेखेचे निरनिराळे पैलू उजेडात येण्यास मदत होते. ‘आभाळमाया’साठी तिला म. टा. सन्मान पुरस्कार मिळाला.
अभिनयाबाबत आस्था होती.

पती संजय मोने, हे याच क्षेत्रातील असल्यामुळे, या क्षेत्रासकट इथलं वातावरण, टायमिंग हे सारं त्यांना ठाऊक आहे. दोघांचही क्षेत्रं एकच असल्याने वाद झाले तरी मिटतात. ‘ते’ समंजस आहेत, म्हणून, त्यांचा इतका पाठींबा आहे, म्हणून ती करियर करू शकते. त्यांना ‘ज्युलिया’ नावाची एक वर्षाची छोटी मुलगी आहे. अभिनयाच्या ठिकाणाहून एक्झिट घेतली की ती फक्त ‘सुकन्या कुलकर्णी’ असते व हे सवयीनं हळुहळू जमतं अस तिचं ठाम मत! 😊
स्वप्नील लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *