जगाला हसवणारा जाताना रडवून गेला, पहा त्याचा जीवनप्रवास

दादा कोंडके हे नाव म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेलेले नाव आहे. दादांनी अनेक सुपरहिट चित्रपट मराठी प्रेक्षकांना दिले. दादांनी आपल्या एका खास विनोदी शैलीत त्यांनी रसिकप्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. दादांचा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक हास्याची पर्वणीच होय. दादा कोंडके म्हणजे फक्त एक हजरजबाबी विनोदी अभिनेताच नव्हते तर एक विनोदी लेखक, गीतकार, संवादकार, यशस्वी दिग्दर्शक- निर्माता ह्यासारख्या अनेक जमेच्या बाजू त्यांच्या व्यक्तिमत्वात होत्या. व्यक्ती एक परंतु गुण अनेक, असे होते दादांचे व्यक्तिमत्व. परंतु ह्यापलीकडे सुद्धा दादा एक प्रगल्भ व्यक्तिमत्व होते. दादांच्या आयुष्यात प्रचंड विविधता होती. त्यांच्या आयष्यासंबंधित अनेक गोष्टी त्यांनी त्यांच्या ‘एकटा जीव’ ह्या आत्मचरित्रात उलगडल्या. ह्या आत्मचरित्रात त्यांनी आपल्या व्यक्तिगत आणि व्यासायिक गोष्टींवर मनमोकळेपणे लिहिले आहे.

दादांच्या चित्रपटांची त्याकाळी इतकी क्रेज होती कि त्यांचे सलग नऊ चित्रपट सुपरहिट झाल्यामुळे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले होते. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘एकटा जीव सदाशिव’ होय. हा चित्रपट त्यावेळी खूप चालला होता. त्याच दरम्यान हिंदीतील लोकप्रिय अभिनेता दिग्दर्शक निर्माता राज कपूर हे आपला मुलगा ऋषी कपूर ह्याला ‘बॉबी’ चित्रपटातून लाँच करत होते. परंतु दादांचा ‘एकटा जीव सदाशिव’ ह्या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून राज कपूरने ‘बॉबी’ चित्रपट तब्बल ५ महिने उशिरा प्रदर्शित केला. ह्यावरून दादांची लोकप्रियता किती होती ह्याचा अंदाज येतो. अश्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला दादा खऱ्या जीवनात खूपच मातीशी नातं जडलेला माणूस होता. दादांच्या जीवनावर ‘एकटा जीव’ हे आत्मचरित्र लिहिले गेले. ह्या आत्मचरित्रात दादांच्या आयुष्यातील अनेक घटनांचा उल्लेख केला गेलेला आहे. परंतु आत्मचरित्राच्या शेवटच्या पानावर लिहिलेले दादांचे शब्द खूपच बोलके आहेत. हे शब्द प्रत्येक कलाकार आणि माणसाने वाचावे असेच आहे.दादा शेवटी म्हणतात आज एवढा पैसा, प्रॉपर्टी मिळवून काय उपयोग आहे? कुणासाठी मी हे सर्व कमावलं आहे? माझं दुःख, एकटेपणा सहसा मी कुणाला जाणवू देत नाही. त्यामुळे मी एकटा मजेत जगतो अशी बऱ्याच जणांची समजूत आहे. एकटेपणाच्या बदल्यात देवाने मला पैसा, प्रसिद्धी, यश भरपूर दिलं. सर्वांनाच आयुष्यात मनासारख्या गोष्टी मिळत नाही अशी मी स्वतःचीच समजूत घालत असतो. पुढल्या जन्मी देवाने मला पैसा, यश, प्रसिद्धी काहीही दिलं नाही तरी चालेल, पण एकटेपणा देऊ नये. माझी म्हणता येतील अशी माणसं द्यावीत, हीच माझी इच्छा आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *